manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, August 8, 2020

9 ऑगस्ट क्रांती दिन


      9 ऑगस्ट हा भारतभरात क्रांति दिन म्हणून साजरा केला जातो, पण त्याचा इतिहास नक्की आहे तरी काय? असे काय कारण होते की 9 ऑगस्ट हा दिवस चर्चेत आला? त्यात क्रांतिकारकांचे, राष्ट्रपिता महात्मा गांधीचे नक्की काय कार्य होते? असे अनेक प्रश्न या क्रांतिदिनी पडतात. हा एक असा दिवस आहे ज्याने ब्रिटीशांना भारत सोडण्यासाठी भाग पडले, असा हा दिवस नक्की आहे तरी काय?


ऑगस्ट क्रांतीचा नारा 'भारत छोडो'-


या क्रांतीचा नारा होता, 'भारत छोडो'. आणि या एका वाक्याने अशी काही जादू केली की सारा भारत रस्त्यावर उतरला. एक क्षण असे वाटले होते की आता कोणत्याही परिस्थितीत लगेच ब्रिटिश भारत सोडून जातील.


हा काळ होता 1942 सालचा, सार जग टांगणीला लागला होते कारण जगात एक महाभयंकर घटना घडत होती. 'दुसरे महायुद्ध.,' या महायुद्धात सतत होत असलेल्या मित्र राष्ट्रांच्या पराभवामुळे ब्रिटिश हैराण झाले होते. आणि नेमक त्याच वेळी भारत ऑगस्ट क्रांतिने 'छोडो भारत'चा नारा देत पेटून उठला होता. ब्रिटीशांसाठी ही वेळ एकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती.

               या दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपान आता भारतावर आक्रमण करेल याची शक्यता वाढत चालली होती, कारण जपान आता प्रशांत महासागर ओलांडून ब्रम्हदेशापर्यंत (म्यानमार) येऊन पोहचला होता. ब्रिटीशांना आता भारतीयांच्या मदतीची गरज होती. त्यांना आता भीती वाटायला लागली होती की जपान आता भारतावर हल्ला करणार. त्यामुळे ब्रिटीशांनी भारतीयांची मदत मिळवण्यासाठी भारतात असा प्रचार करण्यास सुरुवात केली की, 'भारतीय स्वतः आपल्या देशाचे मालक आहेत आणि आपल्या देशाचे संरक्षण त्यांनीच केले पाहिजे, कारण भारतावर जपानच्या हल्ल्याचा भीती वाढत आहे.'


ब्रिटीशांच्या प्रचारला विरोध करीत गांधीजींनी असे मत मांडले की, "ब्रिटिश भारतात असल्याने जपान भारतावर आक्रमण करीत आहे, म्हणून ब्रिटीशांनी भारत सोडून जावे आणि भारतीयांच्या हाती सत्ता सोपवावी. जर ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली तरच भारत ब्रिटीशांना युद्धात मदत करेल."


फोडा आणि राज्य करा ही नीती धोरणे रखणारे ब्रिटिश हे ऐकण्यास तयार नव्हते, ब्रिटीशांनी याला नकार दिल्याने भारत छोडो अशी धमकी देत भारतीय आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरच उतरले. अनेक कॉंग्रेसच्या नेत्याचे मत होते की जपान युद्धासाठी आवासून असताना आंदोलन करण्याची ही योग्य वेळ नव्हती. यावर निर्णय घेण्यासाठी 1942 ला वर्ध्यात कॉंग्रेस ची बैठक घेण्यात आली आणि त्यात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या पुढाकाराने 'अहिंसा विधरोह' हा कार्यक्रम पारित करण्यात आला.


8 ऑगस्ट 1942 ला मुंबई मध्ये अबुल कलाम आझाद यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस महासमितीची बैठक घेऊन भारत छोडो चा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.


'संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे.'


7 आणि 8 ऑगस्ट ला जेव्हा प्रस्तावावर चर्चा झाली तेव्हा गांधीजी म्हणाले की, "स्वतंत्र मिळाले की आपले काम संपणार नाही, आपल्याला कोणीही हुकूमशहा नको, आपले ध्येय स्वतंत्र मिळवणं आहे, आणि त्यानंतर जो कोणी शासन सांभाळू शकत असेल त्यांनी ते सांभाळावे. शक्यता आहे की तुम्ही निर्णय घ्याल की सत्ता पारसीयांकडे सोपवण्याचा, परंतु तुम्ही हे म्हणू नका की सत्ता पारसींकडे का सोपवावी. शक्यता आहे की सत्ता त्यांना सोपवली जाईल ज्यांचे नाव कॉंग्रेस मध्ये कधी घेतलेही नसू शकेल. हा निर्णय घेण्याचे काम लोकांचे आहे. तुम्ही हा नाही विचार केला पाहिजे की संघर्ष करताना अधिक संख्या हिंदूची होती, मुस्लिम आणि परसींची कमी होती, आणि जर तुमच्या मनात तीळमात्र देखील संप्रदायिकताची छाप असेल तर तुम्ही या संघर्षापासून लांब राहिले पाहिजे."


. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली ‘छोडो भारत’ची गर्जना आणि दिलेला ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरुवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. गांधीजींच्या केलेल्या आवाहनाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांची धाबे दणाणले.


देशातील आंदोलनाची ब्रिटिशांना आदल्या रात्री बातमी मिळाल्याने पहाटे पाच वाजताच महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बिर्ला हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. आता प्रत्येकजण पुढारी होईल, असा संदेश यावेळी गांधीजींनी दिला. ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. या सर्व नेते मंडळींना पुण्यात हलवण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवण्यात आले आणि त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. मात्र ब्रिटिश सरकारने गुप्तता पाळूनही या घटनेची माहिती वा-याच्या वेगाने पसरली. गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याची माहिती पसरली.


नेत्यांची धरपकड झाल्याने शांत होईल, अशी अपेक्षा ब्रिटिशांना होती. मात्र घडले भलतेच. नेत्यांच्या अटकेमुळे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेलं. देशभर जागोजागी आंदोलने, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने जमावबंदी लागू केली. पण लोक आता आदेशांना भीक घालत नव्हते. पोलिसांच्या लाठी हल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. देशातील जनतेने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारल्याची परिस्थिती होती. संपूर्ण देश पेटून उठला होता. दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. ब्रिटिशांकडून दडपशाही सुरू होती. पाहिजे त्याला विनाचौकशी अटक केली जात होती. सारा देश गोंधळलेल्या स्थितीत होता.


         याच दरम्यान कस्तुरबा गांधी आजाराने मरण पावल्या, तर गांधीजी मलेरियाने आजारी होते. याकारणाने लोक अजूनच चिडून उठले, त्यांनी गांधीजीची सुटका करावी अशी मागणी केली, वातावरण आणखी चिघळेल या भीती ब्रिटिशांनी गांधीजींची आणि त्यांच्या सहकार्‍यांची सुटका केली.


भारत छोडो आंदोलनात 940 पेक्षा जास्त आंदोलनकारी मारल्या गेले, 1600 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. तर 60 हजार पेक्षा जास्त आंदोकारांना अटक करण्यात आली.